https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

अस्तित्वाद संकल्पना अर्थ, स्वरूप आणि तत्त्वज्ञान


 

अस्तित्वाद संकल्पना अर्थ, स्वरूप आणि तत्त्वज्ञान-

आधुनिक तत्त्वज्ञानातील एक प्रभावी विचारसरणी आणि दृष्टिकोन 'अस्तित्ववाद' ओळखला जातो. अस्तित्वाद सुरुवातीला तत्त्वज्ञान म्हणून म्हणून उदयाला आले, नंतर त्यांचे चळवळीत रूपांतर झाले. सोरन किर्कगार्द या डॅनिश विचारवंतापासून या विचारसरणीची सुरुवात झाल्यामुळे त्याला अस्तित्ववादाचे जनक मानले जाते. अस्तित्ववादी विचारसरणीची सुरुवात किर्कगार्दपासून झालेली असली तरी अस्तित्व समस्येचा विचार तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्राचीन काळापासून सुरू आहे. सॉक्रेटिस, नित्शे, पास्कल, सेंट ऑगस्टीन, थॉमस अक्किनॉस आणि मॉटन यांच्या तत्त्वज्ञानात अस्तित्ववादाचे प्रतिबिंब आढळून येते. दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्ववाद तत्त्वज्ञानाचा सर्वच क्षेत्रांवर प्रभाव पडलेला दिसतो. नीतीशास्त्र, साहित्य, मानसशास्त्र, समाजकारण आणि राजकारणावरदेखील अस्तित्ववादाचा प्रभाव पडलेला दिसतो. मानवी परिस्थिती आणि जीवन यांच्याकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी आणि तिला अनुरूप अशी जगण्याची शैली अस्तित्ववादाशी निगडित आहे. किर्कगार्द, ज्यों पार्ल सार्त्र, अलबर्ट काम्यू, गॅब्रिअल, कार्ल यास्पर्स, मार्टिन हायडेगर, मॉरिस मर्लो-पॉटी आदी महत्त्वपूर्ण अस्तित्ववादी विचारवंत मानले जातात.

अस्तित्वाद संकल्पना अर्थ आणि परिभाषा-

अस्तित्ववादी विचारांची निश्चित परिभाषा करणे जवळपास शक्य नाही.अस्तित्ववादी विचारवंतांनी व्यवस्थित पद्धतीने या संकल्पनेची मांडणी केलेली नाही. त्यांच्या विचारांत असलेल्या विसंगती वा विरोधाभासामुळे अस्तित्ववाद म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण करणे कठीण होते. अर्थात, या विचारधारेची निश्चित परिभाषा करता येत नसली तरी काही लक्षणांच्या आधारावर अस्तित्ववादाचे विवेचन करता येते. अस्तित्ववाद संकल्पनेतील 'अस्तित्व' या शब्दाचा नेमका अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न विश्वास पाटील यांनी केलेला आहे. हा संदर्भ रेखा इनामदार साने यांनी 'अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी' नामक पुस्तकात पुढील शब्दांत व्यक्त केलेला आहे, अस्तित्व हा शब्द मानवी व्यक्तीला व त्यातल्या त्यात आत्मोद्धाराच्या कल्पनेने ज्याला पछाडले आहे, अशा व्यक्तीला लावला जातो. त्यामुळे मुळात अस्तित्व म्हणजे 'त्या तिथे जगात असणे' हा जो अर्थ होता त्याऐवजी अस्तित्व म्हणजे काही अंशी सार्वत्रिकपणे आढळून येणारा मानवी विशेष व काही अंशी समानदर्शक चिन्हे म्हणून हा शब्द तत्त्वचिंतनास वापरण्यात येतो. अस्तित्ववाद म्हणजे निव्वळ जन्माला येणे नव्हे तर आपल्या आत्माविष्कारातून स्वतःला सिद्ध करणे होय. आपल्या विचार आणि कृतीतून आपल्या अस्तित्वाला निश्चित अर्थ प्रदान करून देणे होय. आपल्या स्वाभाविक क्षमतांना अनुसरून स्वतःला घडवत जाणाऱ्या व्यक्तीविषयी, तिच्या जाणिवांविषयी आणि तिला पडणाऱ्या समस्यांविषयी चिंतन करणारा विचार म्हणजे 'अस्तित्ववाद' हा आशय विश्वास पाटील आणि रेखा इनामदार-साने यांच्या लिखाणात आलेला आहे तो योग्य वाटतो.

अस्तित्ववाद विचारधारा व्यक्तीच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. व्यक्तीच्या अस्तित्वाला घातक मानल्या जाणाऱ्या सर्वकषशाही, अंधविश्वास, अवैयक्तिकरण, वैज्ञानिक बुद्धिवाद आदींना अस्तित्ववादी विरोध करतात. अस्तित्ववाद मानवाला समजण्याचा, त्याची व्याख्या करण्याचा आणि मानवाला जीवन जगण्या योग्य बनविण्याचा प्रयत्न करते. मानवी जीवनातील निराशेचे ढग दूर करून जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक कार्य आणि प्रत्येक सत्य मानवी वातावरण व मानवी वैयक्तिकतेच्या आधारावर समजण्याचा प्रयत्न करते. तत्त्व, सिद्धान्त, अमूर्त संकल्पनांवर विश्वास ठेवत नाही. ते वस्तू आणि व्यक्तीच्या अस्तित्वाला प्राधान्य देतात. साच्या मते, 'मानव हा सर्वात आधी 'मानव' आहे नंतर तो हा आहे तो नाही.' मानव स्वतः आपल्या विकासाचा मार्ग निर्धारित करत असतो. जीवन जगण्याचे मार्ग आणि मूल्य निर्माणदेखील स्वतः करत असल्यामुळे आपल्या कार्यासाठी तो स्वयं उत्तरदायी असतो. अस्तित्ववाद विचारसरणीच्या लक्षण आणि वैशिष्ट्यांचा विचार करता ही विचारधारा नशावाद, संशयवाद आणि रोमांचवादाचे मिश्रण आहे. अस्तित्ववादी चिंतन व्यक्तीला दार्शनिक विचारांचे केंद्रबिंदू मानते. व्यक्तीचे अस्तित्व, चेतना, अनुभव आणि भावना यांना महत्त्व देते. मानवी स्वातंत्र्यप्राप्तीस सर्वाधिक महत्त्व देते. मनुष्याच्या कर्माबद्दल स्वतःस जबाबदार मानून कार्य करण्यास प्रवृत्त करते. अस्तित्ववादात मानवी आणि मानवेतर गोष्टी यात फरक केला जातो. मानवी अस्तित्वाला अस्तित्वाची जाणीव असते, तर मानवेतर गोष्टींना ती नसते. मानव आणि मानवेतर असा फरक अस्तित्ववादी करतात.

अस्तित्वाद संकल्पना स्वरूप आणि तत्त्वज्ञान अस्तित्ववादी विचारवंतांच्या विचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर भिन्नता आढळून येत असली तरी सर्वांच्या विचारांत एका तत्त्वाबाबत समानता आढळून येते ते म्हणजे वैयक्तिक मानवी अस्तित्वावर सर्वांनी दिलेला भर होय. अस्तित्ववादी आग्रह करतात की, दर्शन वा तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तीचे आपले जीवन, अनुभव ऐतिहासिक स्थितीशी जोडले पाहिजे. ज्यामधून व्यक्ती स्वतःला जाणून घेऊ शकेल, व्यक्तीला जीवन जगण्यास योग्य बनू शकेल अशा प्रकारच्या तत्वज्ञानाची उभारणी करण्याचा प्रयत्न अस्तित्ववादी करतात. मानवाच्या परिस्थितीविषयी, मानवी अस्तित्वाच्या स्वरूपाविषयी आणि मानवाने कसे जगावे याविषयी अत्यंत मूलगामी स्वरूपाचे प्रश्न अस्तित्ववादी तत्वज्ञ उपस्थित करतात. विलक्षण आस्थेने आणि उत्कट जिव्हाळ्याने प्रश्न विचारतात, यात त्या तत्त्वज्ञानाचे वेगळेपण सामावलेले आहे. अस्तित्ववादी अमूर्त चिंतन नाकारून तर्कसंगत आणि वैज्ञानिक आधारावर विवेचन करतात. मानवाची भावना, संवेग आणि तत्कालिक अनुभव हे त्यांचे प्रमुख आधार आहेत. वैज्ञानिक बुद्धिवाद, निर्वैयक्तिकरण, सर्वाधिकारवाद इत्यादी विचारधारांना विरोध करतात. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला नष्ट करणाऱ्या वा व्यक्तीच्या अस्तित्वाला नाकारणाऱ्या सर्व सामाजिक-बौद्धिक विचारधारा आणि शक्तींना विरोध करतात. व्यक्तीचे अंतरंग आणि अस्तित्व परक अस्तित्वाशी संबंधित समस्यांकडे आपले लक्ष वेधतात. मानवाच्या वैयक्तिक चिंता, पीडा, त्रास, दुर्भाग्य, अर्थहीनतेच्या आधारावर मानवाचे वास्तविक चित्र रेखाटतात. मानव पूर्णपणे एकटा, एकांत, अर्थशून्य जीवन जगत आहे. या हताश परिस्थितीचा फायदा दमनकारी व्यवस्था उचलत आहे. उदा. हुकूमशाही सुरक्षा, आर्थिक विकासाचे आश्वासन देऊन आपल्या स्वातंत्र्याचे अपहरण करते. व्यक्ती हा आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेचा एक भाग आहे. आपले स्वतंत्र अस्तित्व वा 'स्व' नष्ट झाल्यामुळे आपली ओळख हरवलेली आहे.

या विश्वाला आणि त्यात वास्तव्य करणाऱ्या मानवी अस्तित्वाला कोणताही पूर्वनियोजित हेतू नसतो. त्यामुळे अस्तित्ववादी तत्त्वचिंतक मानवाच्या कोय अस्तित्वापासून सुरुवात करतात. मनुष्य आपले जीवन घडविण्यास स्वतंत्र असतो परंतु, तो धर्म, विज्ञान आणि विश्व यांना शरण जातो. या शरण जाण्याच्या प्रवृत्तीला नाकारून आपल्या बुद्धी वा प्रज्ञेच्या आधारावर निर्णय घेण्याला अस्तित्ववादी प्राधान्य देतात. संघटित भांडवलशाही आणि केंद्रीकृत राज्याने मानवी व्यक्तित्वाला हानी पोचविली आहे. व्यक्ती एक वस्तू किंवा उत्पादन बनून राहिलेला आहे. मानवी भावभावनांना फारसा अर्थ राहिलेला नाही. पश्चिमी प्रगत उद्योगप्रधान संस्कृतीत आर्थिक समृद्धी, उत्पादनवाढ, भौतिक सुखसुविधांची रेलचेल आहे. परंतु, या सर्व गोष्टीची मक्तेदारी भांडवलदाराच्या हातात असून, तो त्यांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. त्यामुळे व्यक्तीमध्ये  अलगतावादी वा निराशावादी प्रवृत्ती जोर पकडते आहे.

यंत्रप्रधान युगात व्यक्ती आपल्या आयुष्याचा बराचसा काळ जीवनासाठी आवश्यक वस्तू मिळविण्यात खर्च करतो. दैनंदिन गरजांच्या पूर्तीचा सातत्याने व्यक्तीवर दबाव राहत असतो. आर्थिकदृष्ट्या संपन्न जीवन मिळविण्यासाठी व्यक्ती सतत धावपळ करत असतो. मूलभूत गरजांच्या पूर्तीच्या तणावातून स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. परिणामतः उच्च नैतिक आणि सांस्कृतिक जीवन निर्माण आवश्यक विचार करण्याची फुरसत व्यक्तीला मिळत नाही. यंत्रयुगात व्यक्तीला एकटेपणा वा असाहाय्यतेची जाणीव होत राहते. इतर व्यक्तींशी असलेला संपर्क तुटतो. व्यक्तीचा संपर्क कारखाने, कामाची ठिकाणे, दुकाने, दळणवळणाच्या साधनांशी होतो. व्यक्ती आणि समाज यातील दरी वाढत जाते. व्यक्ती दिवसेंदिवस एकटा होत जातो. समाज, राज्य, कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांपासून तुटत जातो. आधुनिक काळात समाजातील राजकीय संघटनांचे अवाजवी केंद्रीकरण आणखी औपचारिक झाल्यामुळे व्यक्ती कितीही मोठ्या पदावर जाऊन पोचला तरी तो व्यवस्थेला फारसा प्रभावित करू शकत नाही; कारण तो व्यवस्थेचा एक भाग बनतो. प्राचीन समाजव्यवस्थेत व्यक्ती कुटुंब आणि समुदायासोबत आनंदाने जीवन व्यतित करत होता. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत होता. व्यक्ती व्यक्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर भावनात्मक संबंध होते.

व्यक्तिवादी विचारधारेच्या प्रवर्तकांनी, व्यक्तिवादाच्या विकासातून व्यक्तीवर होणारा अन्याय, अत्याचार कमी होईल. व्यक्ती रूढी, परंपरा आणि नैतिक बंधनापासून मुक्त होऊन स्वतंत्रता, प्रगती आणि मुक्तिदायी जीवनाचा उपभोग घेईल, हा आशावाद व्यक्त केला; परंतु, २०व्या शतकात महायुद्ध, असुरक्षा, आतंकवाद, दहशतवाद, विघटन यामुळे व्यक्तिजीवन संकटांनी घेरलेल्या अवस्थेत पोचले. व्यक्तीला आपल्या अस्तित्वाची चिंता वाटायला लागली. आपले अस्तित्व कधी नष्ट होईल, याची त्याला शाश्वती राहिली नाही. तो आपल्या अस्तित्वाची सार्थकता शोधू लागलेला आहे.

व्यक्तिनिष्ठा हाच विचाराचा आरंभबिंदू असला पाहिजे, यावर अस्तित्ववादी भर देऊ लागले. 'असणे' आणि 'अस्तित्व' म्हणजे मानवी वस्तुस्थिती होय, मनुष्य आधी अस्तित्वात येतो मग तो व्याख्या करतो म्हणजे मनुष्य हाथ स्वतःला घडवत असतो. माणूस जे काही असतो त्याला तो स्वतः जबाबदार असतो. माणूस म्हणजे काय आणि त्याच्या असण्याची सर्व जबाबदारी त्याच्यावर कशी असते, याचे भान आणून देणे हे अस्तित्ववादाचे पहिले काम असते. माणूस स्वतःला जबाबदार आहे. याचा अर्थ तो सर्व माणसांना जबाबदार आहे. मी स्वतःला जबाबदार आहे म्हणजे मी प्रत्येकाला जबाबदार आहे. माणूस स्वतःला जबाबदार असल्यामुळे अस्तित्ववादी ईश्वरी उत्तरदायित्याला नाकारतात. माणूस मुक्त आहे म्हणजे स्वतःच्या चुकांबद्दल स्पष्टीकरण नाही, तो पूर्णपणे एकटा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.